विकसित भारत संकल्प यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात मोदी सरकारने कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) विकसित भारत संकल्प यात्रेला देशवासियांनी जनआंदोलनाचं स्वरुप दिलं असून यात्रेला मिळणारा प्रतिसाद गेल्या ९ वर्षात सरकारनं कमावलेल्या विश्वासाचं प्रतीक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या  केंद्र सरकारच्या विविध  योजनांच्या लाभार्थ्यांशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. केंद्रसरकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती आणि लाभ तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी निघालेल्या या संकल्प यात्रेला अवघ्या १५ दिवसात मिळालेला प्रचंड प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं ते म्हणाले. यात्रेच्या रथाचं नामकरण मोदी की गारंटीवाली गाडी असं जनतेनेच केलं असल्याचं सांगून ते म्हणाले की आतापर्यंत  १२ हजार गावांमध्ये ही गाडी पोहचली आहे.

सरकारच्या सर्व महत्त्वपूर्ण योजना नियोजित वेळेत गावातील शेवटल्या व्यक्तीपर्यंत  पोहचायला हव्या, असं ते म्हणाले. महिला किसान ड्रोन केंद्राचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते यावेळी झालं. या उपक्रमाअंतर्गत पुढच्या तीन वर्षांत 15 हजार ड्रोन्स तसंच ड्रोन वापराचं प्रशिक्षण महिला बचत गटांना दिलं जाणार आहे.  यावेळी प्रधानमंत्र्यांनी २५ हजार  जनौषधी केंद्र  स्थापन करण्याच्या कार्यक्रमाचा प्रारंभ केला, तसंच देशातलं १० हजारावं जनौषधी केंद्र राष्ट्राला समर्पित केलं.

देशभरात दूरदृष्य प्रणाली द्वारे प्रक्षेपित झालेल्या या कार्यक्रमाला मुंबईतून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. मुंबईतल्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थी उर्मिला देवाडिगा यांनी सांगितलं. नागपूर जिल्ह्यात वडधामना इथं या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यात अंजनगाव बारी इथं या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. अमरावती जिल्ह्यातले विविध योजनांचे लाभार्थी प्रवीण तौलारी यांनी सांगितलं.