माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोमुळे चार लाख प्रवाशांना लाभ होईल - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

 

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पुणे मेट्रो मार्गिका-३ मुळे हिंजवडी परिसरातील वाहतूक समस्या सुटण्यासोबत चार लाख प्रवाशांना लाभ होणार असून या मेट्रो मार्गिकेच्या कामातील अडचणी दूर करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

पुणे विमानतळ येथे माण-हिंजवडी ते शिवाजीनगर पीएमआरडीए टाटा सिमेन्स मेट्रो मार्गाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, पुणे आयटी सीटी मेट्रो रेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपूर, पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर आदी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नागरिकांना घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत येण्यासाठी पीएमपीएमएलची बससेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यास कमी वेळ लागल्यास नागरिकांचा प्रतिसाद वाढेल. त्यादृष्टीने स्थानकाजवळ वाहनतळाची सुविधा करण्यात यावी व मेट्रो सेवेला जोडणारी बससेवा प्रवाशांना उपलब्ध करून द्यावी. हा मेट्रोमार्ग सतत वाहनांची वर्दळ असणाऱ्या भागातून जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासही मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्री श्री. पाटील यांनी मेट्रोमार्गिका-३ च्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. मेट्रो मार्गिका उभारणीतील अडथळे दूर करून हा मार्ग अधिक लवकर पूर्ण होईल असे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली. शासन स्तरावर मेट्रोमार्गिकेसाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

श्री.कपूर यांनी मेट्रो मार्गिकेविषयी माहिती दिली. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर हा सुमारे २४ किलोमीटर लांबीचा असून या मार्गिकेत २३ स्थानके आहेत, त्यापैकी १६ स्थानकांचे काम सुरू आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च ८ हजार ३१३ कोटी आहे. सर्वेक्षणाच्या अहवालानुसार या मार्गिकेच्या परिसरात दररोज १४ लाख नागरिक प्रवास करतात. या मार्गिकेमुळे प्रवाशांना शिवाजीनगर व सिव्हील कोर्ट येथे मार्गिका बदलून महामेट्रोच्या सेवेद्वारे शहराच्या इतर भागात जाता येईल. प्रवासाचा एकूण वेळ केवळ ३५ मिनिटे असल्याने नागरिकांच्या वेळेची बचत होऊ शकेल. आतापर्यंत प्रकल्पाचे ४५ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image