महाराष्ट्राची लूट होत असून मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होत आहे- उद्धव ठाकरे

 



मुंबई (वृत्तसंस्था) : भांडवलदारी वृत्तीमुळे मुंबई आणि महाराष्ट्राची लुट होत आहे, असं सांगत मुंबईच महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेत ठाकरे बोलत होते. राज्यातल्या  शिंदे-फडणवीस सरकारवर त्यांनी यावेळी टीकेची झोड उठवली. प्रस्तावित बारसु रिफायनरीबाबत चर्चा करण्यासाठी येत्या ६ मे रोजी आपण बारसूला जाणार आहोत. बारसूच्या लोकांनी मान्यता दिली तरच रिफायनरी असं  आपलं  धोरण होतं , असंही ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं. अवकाळी पावसानं कोकणात आंबा उत्पादनाचं नुकसान झाले असून प्रत्येक झाडामागे नुकसान भरपाई देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.

राज्यातल्या  शिंदे-फडणवीस सरकारनं आर्थिक शिस्त बिघडवली आहे. जनता त्रस्त आहे. पण, सरकार भलत्याच कामात व्यग्र  आहे, असा आरोप विधानसभेतले  विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला.कायदा आणि  सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असताना हे सरकार जबाबदारी घेत नाही, असं पवार म्हणाले. 

महाविकास आघाडीकडे जनता जनार्दनाच्या आशिर्वादाची शक्ती आहे. महाराष्ट्राची जनता आयाराम गयाराम राजकारणाला स्विकारत नाही. हे विविध निवडणूकीतून जनतेने दाखवून दिलं आहे, असं  काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितलं.  

केंद्र आणि राज्यातल्या  सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीने एकसंधपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याची भावना सर्वच नेत्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.