१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु असून या ठिकाणी ठरविलेल्या ४०० वंदे भारत रेल्वे पैकी १२० वंदे भारत रेल्वेंची निर्मिती केली जाणार असल्याचं केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल सांगितलं. मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.

केंद्र शासनानं लातूर इथं रेल्वे बोगी कारखाना उभारण्यासाठी ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी सातत्यानं पाठपुरावा सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं.