राहुल गांधी यांचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधी यांचं भारतीय लोकशाहीबद्दलचं वक्तव्य आणि अदानी समूह प्रकरणात चौकशीची मागणी या मुद्द्यांवरुन संसदेत आजही गदारोळ झाला. दोन्ही सभागृहात घोषणाबाजी चालू राहिल्याने कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. लोकसभेत आज सकाळी सुरुवातीलाच काँग्रेस, द्रमुक राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांचे सदस्य हौद्यात उतरले आणि अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीमार्फत करण्याची मागणी करणाऱ्या घोषणा देऊ लागले. सभापती ओम बिरला यांनी सदस्यांना जागेवर जायला सांगितलं मात्र गदारोळ थांबला नाही त्यामुळे त्यांनी कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.

राज्यसभेतही हीच परिस्थिती होती. अदानी समूह प्रकरणासंदर्भात विरोधी पक्ष सदस्यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळला. सदस्यांनी सभागृहाच्या शिस्तीचं पालन करावं आणि विधायक चर्चेत सहभागी व्हावं असं त्यांनी सांगितलं. तेव्हा सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी राहुल गांधींकडून माफीची मागणी करणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमआदमी पक्ष, डावे पक्ष सदस्य अदानी प्रकरणी चौकशीची मागणी करणाऱ्या घोषणा देऊ लागले. शेवटी सभागृहातल्या सर्व गटनेत्यांची बैठक घेण्याचं अध्यक्ष धनखड यांनी जाहीर केलं, आणि कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं.