३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसे अंतीम फेरीत दाखल

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अहमदाबाद इथं सुरु असलेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत, महाराष्ट्राचा युवा नेमबाज रुद्राक्ष पाटील आणि आर्या बोरसेनं अंतीम फेरी गाठली आहे. हे दोन्ही युवा नेमबाज आपापल्या 10 मीटर एअर रायफल गटात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. आज सकाळच्या सत्रात झालेल्या पात्रता फेरीत रुद्रांश पाटीलनं 630 पूर्णांक 7 दशांश गुणांची कमाई केली. तो तिसऱ्या स्थानावर राहिला. पुरुषांच्या या गटामध्ये तामिळनाडूच्या साई कार्तिकनं अव्वल, तर मध्य प्रदेशाच्या ऐश्वर्यनं दुसऱ्या स्थान पटकावलं..आर्या बोरसेनं महिलांच्या दहा मीटर एअर रायफल गटात ने पात्रता फेरीमध्ये 627 पूर्णांक 2 दशांश गुण मिळवले. उद्या अंतिम फेरीत सुवर्ण पदक मिळवण्याची संधी या दोघांना आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला रग्बी संघांनी साखळी सामन्यात बाद फेरी गाठली आहे. महिला गटाच्या साखळी सामन्यात महाराष्ट्र संघानं बिहार संघाचा २४-० असा पराभव करून गटात अव्वल स्थान पटकावल आणि तो बाद फेरीत दाखल झाला. पुरुष गटाच्या  साखळी लढतीत महाराष्ट्र रग्बी संघाचा हरियाणा संघाकडून १४-१७ असा पराभव झाला होता, पण अ गटात संघाची एकूण कामगिरी चांगली असल्यानं महाराष्ट्र संघानं बाद फेरी गाठली आहे. बाद फेरीत महाराष्ट्र पुरूष संघाचा सामना ओडिशा संघाशी होणार आहे. महिलांच्या टेनिस स्पर्धेत एकेरी सामन्यात महाराष्ट्राच्या वैष्णवी आडकरनं दिल्लीच्या काव्या खिरवारचा ६-२, ६-२ असा, तर ऋतुजा भोसलेनं कशिश भाटियाचा ६-०, ६-१ असा पराभव केला .