कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये - रिझर्व्ह बँक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्ज वसुली एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा छळ करु नये किंवा त्यांना धमकावू नये अशा सूचना रिझर्व्ह बँकेनं सर्व वित्तीय संस्थांना केल्या आहेत. या एजंटांनी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींचा सार्वजनिकरित्या अपमान करु नये किंवा त्यांच्या खासगी आयुष्यात हस्तक्षेप करु नये. त्यांच्या कुटुंबाला किंवा मित्रमंडळींनाही त्रास देऊ नये असे आदेशही रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. यासंदर्भातले दिशानिर्देश बँकेनं काल प्रसिद्ध केलं. याअंतर्गत सकाळी ८ वाजेपूर्वी आणि रात्री ७ वाजेनंतर कर्ज वसुलीसाठी किंवा इतर कारणासाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तींना फोन करु नये, असंही स्पष्ट केलंय. या कालावधीत SMS किंवा समाज माध्यमांद्वारे संदेशही पाठवू नये, त्यांना वारंवार फोन करु नये, त्यांना धमकी देणारे फोन करु नये अशा स्पष्ट सूचना रिझर्व्ह बँकेनं दिल्या.

सर्व सरकारी आणि खासगी बँका, सहकारी बँका, विभागीय ग्रामीण बँका, बँकेतर वित्तीय संस्था आणि इतर वित्तीय संस्थांना हे निर्देश लागू होणार आहेत. या दिशानिर्देशांचं उल्लंघन झालं तर त्याकडे गांभिर्यानं पाहिलं जाईल, असं बँकेनं म्हटलं आहे. वार्षिक ३ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबाना दिलेली लघु वित्त कर्ज किंवा कुठल्याही वस्तू गहाण ठेवल्याशिवाय देण्यात आलेल्या कर्जांना हे नियम लागू होणार नाही, असंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलंय.