मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लोकमान्य टिळक यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

मुंबई : “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे आद्य स्मरण हे आपले कर्तव्य आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे.

            मंत्रालयात मुख्यमंत्री शिंदे यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी आमदार सदा सरवणकर, आमदार शहाजी (बापू) पाटील, मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव भूषण गगराणी, सामान्य प्रशासन विभागाच्या (प्र.सु.व र.व.का.) अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक, प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.

            ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे सांगत लोकमान्य टिळक यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्य आणि स्वराज्य यांचा हुंकार भरला. त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती आपल्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. जयंतीनिमित्त लोकमान्य टिळक यांना विनम्र अभिवादन,’ असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.