कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही राज्यानं प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. असं ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंह चहल, पोलीस आयुक्त संजय पांडे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी मनिषा म्हैसकर, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन आणि पोलीस दलातील ज्येष्ठ अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.आज सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतल्या हुतात्मा चौक इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करुन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील हुतात्म्यांना अभिवादन केलं. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी नागपूर जिल्ह्यातील विविध विकास कार्याची माहिती देतांना राज्यातील जनतेला भारनियमनाची झळ बसणार नाही असं आश्वासन दिलं.राज्याच्या सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते तर काही ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.