घरीच कोरोना चाचणी केलेल्या नागरिकांना चाचणीचे निष्कर्ष संबंधित वेबसाइट आणि स्थानिक प्रशासनाला कळविण्याचं राज्य सरकारचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड १९ च्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, सक्रीय रुग्णसंख्याही वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य विभागाचे अतिरीक्त मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि दंडाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी तुलनेनं चाचण्यांचं प्रमाण अल्प असून, कित्येक पॉझिटिव्ह रुग्ण स्वयं निदान करुन गृहविलगीकरणात असल्याचं आढळत आहे. मात्र चाचण्यांचं प्रमाण वाढवून त्यांची नोंद होणं आवश्यक असल्याचं या पत्रात म्हटलं आहे. कोरोनाच्या स्वयंनिदान परीक्षणाद्वारे घरातच चाचणी केली असली तरी त्याची नोंद आयसीएमआरच्या वेबसाइटवर करणं अनिवार्य आहे, अशी सूचना त्यांनी केली आहे. आरटीपीसीआर चाचण्यांऐवजी रॅपीड अँटिजेन टेस्टचा परिणाम लवकर कळत असल्यानं रुग्णसंख्या जास्त असलेल्या भागात रॅपीड अँटिजेन टेस्टच्या प्रयोगशाळा उभारल्या जाव्यात आणि प्रत्येक चाचणीचे निकाल आयसीएमआरच्या पोर्टलवर अपलोड करावेत, असं त्यांनी सांगितलं. पहिल्याच टप्प्यात रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणं तसंच त्यांचं विलगीकरण करणं, हा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रभावी उपाय असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात सध्या ३ हजार ११७ प्रयोगशाळा आहेत. देशाची दररोजची कोविड रुग्णांची चाचणी करण्याची क्षमता २० लाखांपर्यंत आहे. जिल्हास्तरावर सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी कोरोना चाचणी क्षमता वाढवण्यासाठी या प्रयोगशाळांचा लाभ घ्यावा तसंच केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयानं आपत्कालिन कोविड कृती योजनेअंतर्गत दिलेल्या निधीचा वापर करावा, असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत.