ओमायक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध लावण्यासाठीची नवी नियमावली राज्य सरकार आज जाहीर करणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल, तसंच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगानं हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीनं विस्तृत चर्चा करण्यात आली. याबाबत आज नवी नियमावली जाहीर केली जाणार आहे. यावेळी मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी मान्यवर उपस्थित होते.