देशात काल २६ हजारांहून अधिक रुग्ण झाले बरे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९५ पूर्णांक ९९ शतांश टक्क्यांवर पोहोचलं आहे.

काल २६ हजारांहून अधिक रुग्ण बरे झाले असून, आतापर्यंत ९८ लाख ३४ हजार रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. काल नव्या २० हजार ५०० रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे देशातली एकूण रुग्णसंख्या, एक कोटी दोन लाख इतकी झाली आहे.

देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्यांची संख्या सातत्यानं घटत असून, सध्या सुमारे दोन लाख ६२ हजार रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत या आजारानं देशात एक लाख ४८ हजार ४३९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातला कोविड मृत्यू दर एक पूर्णांक ४५ शतांश टक्क्यांवर स्थिर असून, हा जगातला सर्वांत कमी मृत्यूदर आहे.