मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक - उपराष्ट्रपती जगदीप धनखड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मानवी हक्कांबाबतच्या जनजागृतीसाठी आणि सक्षमीकरणासाठी देशात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची वाढ होणं आवश्यक असल्याचं मत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं आहे. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं मानवाधिकार दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. ज्या समाजात कायद्यात समानता असते आणि सर्वांना न्याय मिळतो, अशा समाजात मानवी हक्क वाढीला लागतात.

कायद्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही आणि कायदा नेहमीच श्रेष्ठ असतो, असं ते म्हणाले.  देशातला हा सध्याचा नवा नियम असून त्यामुळे मानवी हक्कांना चालना मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं. याबरोबरच, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व हासुद्धा सध्याच्या प्रशासनाचा नवा नियम असून त्यामुळे मानवी हक्कांबाबतच्या जागृतीला चालना मिळायला मदत होत असल्याचं ते म्हणाले.

पूर्वीच्या शासन व्यवस्थेत पारदर्शकता नसल्यामुळे गरीब आणि असुरक्षित लोकांचं अतोनात नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष आणि निवृत्त न्यायमूर्ती अरुण मिश्रा हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक स्तरावर मानवी हक्कांबाबतच्या संकल्पनेची घोषणा झाल्याच्या घटनेचं अमृतमहोत्सवी वर्षं असल्याचंही औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.