भारताची गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताची  गुंतवणूकदारांना अनुकूल धोरणं देशाच्या अन्न उद्योग क्षेत्राला नव्या उंचीवर घेऊन जात आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.ते आज नवी दिल्ली मध्ये  आयोजित, ‘वर्ल्ड फूड इंडिया २०२३’ प्रदर्शनाचं उदघाटन करताना बोलत होते. यंदा प्रदर्शनाचं दुसरं वर्ष आहे.भारताची वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृती ही जागतिक गुंतवणूकदारांसाठी जमेची बाब असून, अन्न उत्पादन क्षेत्रातले  स्टार्ट अप आणि कंपन्यांसाठी ही सुवर्णसंधी असल्याचं ते म्हणाले.अन्न सुरक्षा हे एकविसाव्या शतकातलं जगापुढलं सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी सांगितलं.अन्न प्रक्रिया उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात भारतानं उल्लेखनीय प्रगती साधली असून,पॅकेज्ड फूडला असलेल्या मागणीत लक्षणीय वाढ झाल्यामुळे शेतकरी आणि स्टार्टअप उद्योजकांसाठी नव्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं.भारताची शाश्वत खाद्य संस्कृती हजारो वर्षांच्या काळात  विकसित झाली असून,भारताच्या या ज्ञानाचा संपूर्ण जगाला लाभ मिळेल असं ते म्हणाले.यंदा आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष साजरं होत असून, भारतानं भरड धान्याला ‘श्री अन्न’म्हणून दर्जा दिल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.प्रधानमंत्र्यांनी आज  बचत गटांच्या एक लाखापेक्षा जास्त सदस्यांना  बीज भांडवल सहाय्य वितरित केलं. याच्या साहाय्यानं  बचत गटांना अन्न पदार्थांचं पॅकेजिंग आणि दर्जा सुधारता येईल,आणि त्यांच्या उत्पादनाला बाजारात चांगला भाव मिळेल. वर्ल्ड फूड इंडिया प्रदर्शनामध्ये प्रधानमंत्र्यांनी आज  फूड स्ट्रीटचं  उद्घाटनही केलं. या ठिकाणी विविध प्रदेशांची खाद्य संस्कृती अनुभवता  येईल. भारताची  समृद्ध खाद्य संस्कृती जगापुढे प्रदर्शित करण्यासाठी  अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयानं हा तीन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला आहे. या प्रदर्शनात देशातल्या २३ राज्यांमधले  आणि विविध  देशांचे  १२ शे पेक्षा जास्त प्रदर्शक सहभागी झाले  आहेत.