जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक - उपराष्ट्रपती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जल व्यवस्थापनासाठी लहान जल स्रोतांचं संवर्धन आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक असून, राज्यांमधले पाण्याचे विवाद संपवण्यावर भर द्यायला हवं असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे. जलसंवर्धनामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्वाचा असल्याचं ते आज जयपूरमध्ये आयोजित धरण सुरक्षा परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. देशात जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी १८ टक्के लोकसंख्या आहे, पण पाणी मात्र केवळ ४ टक्केच आहे, त्यामुळे पाणी आणि वीज यासारख्या  नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर विचारपूर्वक  करायला  हवा, असं ते यावेळी म्हणाले. देशात धरण सुरक्षा कायदा लागू झाल्यानंतर देशातल्या ६ हजारांपेक्षा जास्त धरणाचं वार्षिक लेखा परीक्षण  सुरू करण्यात आल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी यावेळी दिली. आगामी काळात धरण सुरक्षेच्या क्षेत्रात आपला देश जगात महत्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या दोन दिवसीय परिषदेत ८०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि भागधारक सहभागी होत आहेत.