जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं आहे. जी २० देशांच्या अर्थमंत्र्यांची आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांची तिसरी बैठक आजपासून गुजरातमधे गांधीनगर इथं सुरु झाली. बैठकीचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास बैठकीच्या अध्यक्षस्थानी आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य, शाश्वत वित्तपुरवठा आणि पायाभूत सुविधा, आंतरराष्ट्रीय कर आकारणी, आणि आर्थिक समावेशन या प्रमुख मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे. जी २० देशांचे, अतिथी देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे मिळून पाचशेहून अधिक प्रतिनिधी बैठकीला उपस्थित आहेत.