आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्त्वाची असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आत्मनिर्भर भारताचं स्वप्न साकार करण्यात पायाभूत सोयी सुविधा आणि दळणवळणीय जोडणी अतिशय महत्वाची असल्यानं, केद्र सरकारचा अशा सुविधा विकसीत करण्यावर भर असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या तेलंगणा दौऱ्यात आज प्रधानमंत्र्यांनी हनमकोंडा इथं सहा हजार शंभर कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सोयी सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली, त्यानंतर त्यांनी जनसभेला संबोधीत केलं.

गेल्या नऊ वर्षांच्या काळात देशभरात पायाभूत सोयीसुविधांच्या विकासप्रक्रीयेनं मोठा वेग धरला असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. सर्वच राज्यांचा विकास करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचा पुनरुच्चारही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केला. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीही या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी पायाभरणी केलेल्या प्रकल्पांअंतर्गत विकसीत केल्या जाणाऱ्या महामार्गांमुळे तेलंगणाल्या मागास भागांचा विकास व्हायला मदत होईल, असं ते म्हणाले.

यामुळे राज्यात औद्योगिक कॉरिडॉर आणि विशेष आर्थिक क्षेत्रांमधली परस्पर जोडणी सुधारायला मदत होईल, असंही गडकरी यांनी यावेळी नमूद केलं. त्याआधी तेलंगणा दौऱ्यासाठी हैदराबाद इथं पोहचल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भद्रकाली मंदिराला भेट देऊन पूजा केली.