राज्यात शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट - शरद पवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शाळा व्यवस्थापनाचा दर्जा खालावणं हे शैक्षणिक परंपरेला लागलेलं गालबोट असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी प्रसिद्ध केलेल्या परफॉर्मेंस ग्रेडिंग इंडेक्स अहवालात, महाराष्ट्र राज्याची दुसर्‍या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरण झाल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून, राज्यात शिक्षणाचा दर्जा खालावत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राज्यातल्या दोन शिक्षकी ३८ हजार शाळांमधला विद्यार्थीपट कमी झाला असून, याची सरकारनं गंभीर दखल घेतली पाहिजे. राज्य सरकारनं लवकरच संबंधितांची बैठक बोलावून आवश्यक उपाययोजना कराव्यात, असंही पवार यांनी या पत्रात सुचवलं आहे.