गेल्या नऊ वर्षात भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याची डॉ. जितेंद्र सिंह यांची माहिती

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या नऊ वर्षांमध्ये भारतानं ३८९ परदेशी उपग्रह प्रक्षेपित केल्याचं केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. दूरदर्शनच्या  वृत्त विभागाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, अंतराळ क्षेत्रात भारत जागतिक स्तरावर वेगानं अग्रगण्य स्थान मिळवत आहे. ज्या देशांनी आपले अंतराळ कार्यक्रम भारताच्या खूप आधी सुरू केले होते, ते आज त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी भारताकडून सेवा आणि सुविधा मिळवत असल्याचं ते म्हणाले.

भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या ४२४ परदेशी उपग्रहांपैकी ३८९ उपग्रह प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या  सरकारने प्रक्षेपित केले आहेत, असं त्यांनी सांगितलं. उपग्रह प्रक्षेपणाच्या प्रमुख कामाव्यतिरिक्त, जून २०२० मध्ये अंतराळ क्षेत्र स्टार्टअप्स साठी खुलं झाल्यापासून, 130 स्टार्टअप्सच्या माध्यमातून भारताच्या अंतराळ उपकरणांनी मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध केल्याचं त्यांनी सांगितलं.