‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं राज्यसरकारचं आवाहन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : 'एच३एन२’ फ्लूचा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी ‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचं आवाहन  राज्यसरकारांना केलं आहे. ‘एच३एन२’ फ्ल्यूच्या प्रकारातल्या शीतज्वराची लाट देशात आली आहे. वातावरणातला बदल, धुळीचं प्रमाण यामुळे ही साथ वाढली असल्याचं तज्ञांचं मत आहे. या पार्श्वभूमीवर कोवीड-१९ साथ रोगाचा अनुभव विचारात घेता राज्य शासनानं 'एच३एन२' बाबतही योग्य उपाययोजना करावी अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.