राज्याचा विकास दर आता स्थिरावत असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

 


मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना काळात राज्याचा विकास दर उणे १० टक्के झाला होता. नंतर तो अचानक वाढला आणि आता स्थिरावतो आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत सांगितलं. अर्थसंकल्पावरच्या सर्वसाधारण चर्चेला ते उत्तर देत होते. विकास दर कमी झाल्याचा विरोधकांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. शेती क्षेत्राचा विकास दर सातत्यानं १० टक्क्यापेक्षा अधिक आहे. सेवा आणि उद्योग क्षेत्राचा विकासदरही वाढतो आहे, असं ते म्हणाले. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सर्व क्षेत्र आणि घटकांना सामावून घेणारा आहे. यात शेतकरी, महिला, आरोग्य क्षेत्र आणि रस्ते निर्मितीसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे या अर्थसंकल्पात कोणताही खर्च कमी केला नसून जिल्हा विकास योजना आणि आदिवासी उपयोजनांचा खर्च वाढवला असल्याचं त्यांनी सांगितलं.  मराठा समाज हा उल्लेखही अर्थसंकल्पात नसल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यावर बोलताना सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ आणि नाशिकमध्ये मराठा विद्यार्थ्यांसाठीच्या वसतीगृहासाठीच्या निधीची माहिती फडनवीस यांनी दिली.