राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी- नाना पटोले

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं राज्यात जातनिहाय जनगणना करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज विधानसभेत केल्याचं त्यांनी बातमीदारांना सांगितलं.

ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी जातनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. पण केंद्र सरकार तशी जनगणना करत नाही. काही राज्य सरकारांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारनं असा निर्णय घ्यावा, असं ते म्हणाले.

आपण विधानसभा अध्यक्ष असताना ८ जानेवारी २०२० रोजी जातनिहाय जनगणना करावी असा ठराव एकमतानं पारित केला होता. असा ठराव करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलं होते. आज विधानसभेत जातनिहाय जनगणनेची मागणी केली पण सरकारच्या वतीनं मंत्र्यांनी त्यावर उत्तर दिले नाही त्यामुळे भाजपा सरकार ओबीसी विरोधी आहे का? असा प्रश्न पडतो, असं ते म्हणाले.

सभागृहात अध्यक्ष विरोधी पक्षाच्या सदस्यांची मुस्कटदाबी करत आहेत, असा आरोप त्यांनी केला. या अध्यक्षांवर अविश्वास ठराव आणण्याचा विचार आम्ही करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.