पुणे : केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहिमे’चा आढावा घेतला. शासकीय योजनांचा लाभ गावातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे उद्दीष्ट समोर ठेवून काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला संचालक जितेंद्र आसती, केंद्रीय सहसचिव रेखा यादव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सह आयुक्त शंकर एल. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, उमेदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वासेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक शालिनी कडू, अग्रणी बँकचे व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांच्यासह बँकेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

श्री. मल्होत्रा म्हणाले, पुणे जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करा. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला पाहीजे. ग्रामपंचायत पातळीवर हे अभियान राबविले जाणार असून या माध्यमातून विविध योजनांचा लाभ ग्रामीण क्षेत्रात सर्वदूर पोहोचावा हाच हेतू आहे. योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

पुणे तसेच औरंगाबाद जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या अभियानाच्या माध्यमातून एक आदर्श मॉडेल उभे तयार करण्याचा प्रयत्न असून हे मॉडेल देशभर दिशादर्शक ठरावे असे काम करण्याचे आवाहन करून श्री. मल्होत्रा म्हणाले, प्रधानमंत्री जन धन योजना, अटल पेंशन योजना यासह महत्वाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर असलेल्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रभावीपणे हे काम व्हायला हवे. यासाठी सामाजिक कार्येकर्ते, स्वंयसेवी संस्था यांचा सहभाग घ्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी पुणे मोहिमेच्या नियोजनाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली. बँकिंग कामकाज, वैयक्तिक बँकिंग,बँक खाती,प्रधानमंत्री जन धन योजना, बचत गट, ग्रामसंस्था, अटल पेन्शन योजना,सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड ,मत्स्यव्यवसाय तसेच डेअरी, बचतगट, ठिबक सिंचनासाठी मुदत कर्ज, अटल भुजल योजना, पंतप्रधान कृषी सिंचन योजना, ग्रामपंचायतींच्या आर्थिक सेवांचे डिजिटायझेशन,प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गृहकर्ज आदी योजनांच्या जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत त्यांनी माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गावपातळीवर उपक्रमांचे सूक्ष्म नियोजन केले असून अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रकल्प संचालक शलिनी कडू यांनीही प्रधानमंत्री आवास योजनांच्या सद्यस्थितीबाबत माहिती दिली.

यावेळी बँकींग तसेच माहिमेसंदर्भात विविध विषयावर चर्चा झाली. याप्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक श्री. ए. एस. राजीव, बँक ऑफ महाराष्ट्र कार्यकारी संचालक विजयकुमार व आशिष पांडे, रिझर्व बँकेच्या महाव्यवस्थापक कल्पना मोरे, नाबार्डचे मुख्य महाव्यवस्थापक जी. एस. रावत तसेच अन्य सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.