देशात दररोज २० किलोमीटर रेल्वे मार्ग बांधण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात दररोज १२ किलोमीटर रेल्वे मार्ग बांधला जात असून लवकरच रेल्वे मार्ग बांधण्याचा वेग दररोज २० किलोमीटर पर्यंत जाईल, असं रेल्वे आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. ते आज जयपूर इथं आयोजित रोजगार मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ३०० युवकांनी नियुक्ती पत्रं देण्यात आली. 

पूर्वी दररोज फक्त ४ किलोमीटर रेल्वे मार्ग बांधला जात होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रेल्वेवर विशेष भर दिला. त्यामुळे गेल्या आठ वर्षात रेल्वेमधे मोठे बदल झाले, असं ते म्हणाले. रेल्वेस्थानकाचं नव्याानं बांधकाम करण्याचं कामही सुरु झालं आहे. देशभारतली २०० स्थानकं जागतिक दर्जाची केली जात आहेत. यातल्या बहुतांश स्थानकांचं बृहत आराखडा तयार केला आहे. दूरसंचार क्षेत्रातही पुष्कळ काम झालं आहे. स्वतःचं फोर-जी आणि फाईव्ह-जी नेटवर्क असलेला, भारत हा जगातला सहावा देश ठरला आहे, असं वैष्णव यांनी सांगितलं.