भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीत संयुक्त राष्ट्र संघातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ही माहिती दिली.

भारतानं अफगाणिस्तानाला मानवतावादी दृष्टीकोनातून ३२ टन  वैद्यकीय साह्यासह इतर स्वरुपाचीही मदत पोहोचवली असल्याचं कंबोज यांनी नमूद केलं. अफगाणिस्तानमध्ये मदत म्हणून पाठवलेल्या गव्हाचं न्याय्य आणि योग्य पद्धतीनं वितरण व्हावं यासाठी,भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक अन्न कार्यक्रमाशी करार केला आहे. तसंच गहू वितरणावर देखरेख आणि समन्वय यासाठी काबूलमधल्या भारतीय दूतावासात एक विशेष पथक देखील तैनात करण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांना अफगाणिस्तानमधे स्थानिकांचा पाठिंबा नसतानाही त्यांच्या कारवाया वाढत असल्याचं दिसतं आणि ही बाब चिंताजनक आहे असं नमूद करताना कंबोज यांनी अलिकडेच काबूलमधे गुरुद्वारावर हल्ला झाल्याचा उल्लेख केला.