राज्यातल्या बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी कायम ठेवण्याचे अजित पवार यांचे संकेत

 

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकास आघाडी कायम राहणार असून, काही जिल्ह्यांमध्ये तिथल्या स्थानिक स्थितीनुसार निर्णय घेतला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.

राजद्रोहाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं सरकार पालन करणार असल्याचं ते म्हणाले. उत्तर प्रदेश सरकार मुंबईत कार्यालय सुरु करण्याच्या वृत्तावर ते म्हणाले की, कोणतंही सरकार कोणत्याही राज्यात कार्यालय स्थापन करु शकतं.

शेतकऱ्यांनी टोकाची भूमिका घेऊन आपलं आयुष्य संपवू नये, असं आवाहन त्यांनी बीडमधल्या शेतकऱ्याच्या आत्महत्ये संदर्भात केलं. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी काळजी करू नये. उर्वरीत ऊसाचं गाळप करण्यासाठी सरकार योग्य ते उपाय करत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.