गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रिमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन अजय कुमार मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली. विरोधी सदस्यांची घोषणाबाजी सुरु असतानाच सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बोलण्याची अनुमती दिल्यावर, राहुल गांधी यांनी अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून हटवण्याची मागणी केली. घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांनी कामकाज चालू द्यावं असं आवाहन सभापतींनी केलं, मात्रं त्याचा उपयोग झाला नाही त्यामुळे त्यांनी कामकाज दोनवाजेपर्यंत तहकूब केलं. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही घोषणााबाजी सुरुच राहिली. या गदारोळातच पर्यावरण आणि वनमंत्री भूपेंद्र यादव यांनी जैविक विविधता सुधारणा विधेयक सभागृहात मांडलं. मात्र गोंधळ कायम राहिल्यानं पीठासन अधिकारी भतृहरी मेहताब यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी नियम २६७ अंतर्गत प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी त्यांना त्यासाठी परवानगी दिली नाही, आणि सभागृहाचं कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब केलं. पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि द्रमुकच्या सदस्यांनी हौद्यात उतरुन घोषणाबाजी सुरु केली. ओमायक्रॉनमुळे उद्भवलेल्या स्थितीवर काल सुरु केलेली चर्चा पुढं चालू करावी, असं उपाध्यक्ष हरवंश यांनी सांगितलं. त्यांनी सदस्यांना शांततेचं आवाहन केलं, मात्र त्याचा उपयोग झाला नाही, त्यामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं.