नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून, कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकारने आज सर्वपक्षीय बैठक घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, उद्योग आणि वाणिज्यमंत्री पीयुष गोयल, काँग्रेस नेते अधिररंजन चौधरी, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन यांच्यासह ३३ पक्षांचे मिळून ४० पेक्षा जास्त प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. त्या सर्वांनी बैठकीत मौल्यवान सूचना केल्याचं प्रधानमंत्री म्हणाले अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
या अधिवेशनात एकूण २९ विधेयकं मांडण्यात येणार असून त्यातली ६ अध्यादेशांचं कायद्यात रुपांतर करण्यासाठीची आहेत अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली.
या अधिवेशनात कोविड परिस्थितीबरोबरच शेतकऱ्यांचं आंदोलन, संघराज्य रचनेविषयीचे मुद्दे, सरहद्दीवर चीनच्या हालचाली यासारख्या व्यापक प्रश्नांवर चर्चा व्हावी असं प्रतिपादन विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. एकूण २० पक्षांच्या खासदारांनी बैठकीत आपलं म्हणणं मांडलं.
लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनीही आज सर्व संसदीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. हे अधिवेशन येत्या १३ ऑगस्टपर्यंत चालणार असून त्यादरम्यान दोन्ही सभागृहांच्या १९ बैठका होतील. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी काल राज्यसभेतल्या पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. सदस्यांनी कोविडविषयक प्रश्नांवर चर्चा करावी, कामकाज चालवण्यात सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलं.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.