दहावीच्या निकालांसाठी राज्य शिक्षण मंडळाचं मूल्यमापन धोरण जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा इयत्ता दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याने अकरावी प्रवेशासाठी दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित वैकल्पिक सीईटी घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभाग स्पष्ट केले आहे. तर दहावीच्या निकालांसाठी राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापन धोरण जाहीर केले आहे.

या धोरणानुसार विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षातील अंतर्गत लेखी मूल्यमापन ३० गुण, गृहपाठ / तोंडी परीक्षा/ प्रात्यक्षिक परीक्षा यांना २० गुण आणि विद्यार्थ्यांचे ९ वीचे विषयनिहाय अंतिम निकालाचे ५० गुण या आधारे विद्यार्थ्यांचे यंदाचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा निकाल जाहीर केला जाणार आहे.

निकालासाठी शाळास्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. तर, निकालांची पडताळणी विभागीय स्तरावर शिक्षण अधिकाऱ्यांकडून केली जाईल.गैरप्रकार, शिस्तभंग झाल्यास दंडात्मक कारवाईचा इशाराही विभागाने दिला आहे.

ज्यांना हा निकाल समाधानकारक वाटणार नाही त्यांना कोविडची परिस्थिती सामान्य झाल्यावर मंडळाच्या प्रचलित पद्धतीनुसार श्रेणीसुधार योजनेअंतर्गत परीक्षा देण्याची संधी असणार आहे.