पुणे: संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० चे वितरण करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. यावेळी कैवल्यधाम संस्थेचे अध्यक्ष महेशानंद, सचिव ओमप्रकाश तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, प्राध्यापक आर.एस. भोगल यांच्यासह संस्थेतील योगा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, मनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे, असे राज्यपाल श्री कोश्यारी यांनी म्हटले.
अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणाले, योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन, चेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहे, असे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.
राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करुन विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल त्रिवेदी यांनी केले तर आभार सुबोध तिवारी यांनी मानले.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.