शेतकऱ्यांशी चर्चा करायला सरकार सदैव तयार - केंद्रीय कृषि मंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करायला सरकार सदैव तयार असल्याचं केंद्रीय कृषि मंत्री अर्जुन मुंडा यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या सीमेवर वेगवेगळ्या ठिकाणी आजपासून शेतकरी आंदोलन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर ते आज नवी दिल्ली इथ बतमीदारांशी बोलत होते. शेतकऱ्यांचं हित जपण्यासाठी सरकार बांधिल आहे, आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं ते यावेळी म्हणाले. शेतकऱ्यांचा  प्रश्न हा  राज्य सरकारांशी देखील निगडित असून, त्यावर चर्चेमधून तोडगा काढण्यासाठी एक मंच स्थापन करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली इथं हवाई मार्गानं येणाऱ्या प्रवाशांनी योग्य नियोजन करावं अशी सूचना दिल्ली विमानतळ प्राधिकरणानं केली आहे. प्रवाशांनी वाहतुकीच्या मार्गांमध्ये केलेल्या बदलांचं पालन करावं आणि पर्यायी मार्गांबद्दल माहिती घ्यावी. तसंच विमानतळ टर्मिनल १ साठी किरमिजी लाइन तर टर्मिनल ३ साठी एअरपोर्ट लाइन चा वापर करावा असं आवाहन विमानतळ प्रशासनानं केलं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनामुळे  दिल्ली-नोएड-चिल्ला सीमेवर वाहतूक ठप्प झाली आहे.