राष्ट्राचा विकास हीच रामपूजा आहे - मंत्री अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्राचा विकास हीच रामपूजा असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलं आहे. ते काल रात्री  ठाण्यात ३८ व्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेत, रामपूजा ते राष्ट्र पूजा या विषयावर बोलत होते. २०१४ पर्यंत भारतात ६५ टक्के लोकसंख्या उघडयावर शौचाला जात होती.

केवळ तीन कोटी जनतेला नळाद्वारे पाणीपुरवठा होत होता. सुमारे ५० टक्के जनतेचं बँकेत खातं नव्हतं. ही उणीव आताच्या केंद्र सरकारनं भरुन काढली. त्यामुळं ही राष्ट्रपूजाच आमच्यासाठी रामपूजा आहे. यामुळे २०४७ पर्यंत भारत विकसित देश बनण्याचा संकल्प पूर्ण करेल, असा विश्वास ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला.

अयोध्येत राममंदिर पूर्णत्वाकडे जात आहे. ते येत्या २२ जानेवारीला खुलं होणार असल्यामुळे तमाम भारतीयांचं स्वप्न साकारणार आहे, असं ते म्हणाले. यावेळी आमदार संजय केळकर, ठाणे शहर भाजप अध्यक्ष संजय वाघुले आदी उपस्थित होते.