अंमली पदार्थांशी संबंधीत प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्‍यांचा सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ करण्याची उपमुख्यमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विधान परिषदेत विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून गोंधळ केला. अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीवरील चर्चे दरम्यान, सरकार आता मदत जाहीर करेल पण हा प्रकार म्हणजे म्हणजे 'ऑपरेशन सक्सेस, पेशंट इंज डेड' असं म्हणत विरोधी पक्षाचे सदस्य अनिल परब यांनी सरकारवर टीका केली. शेतकरी मरतो आहे. अशा मरणाऱ्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करतो असं ते म्हणाले आणि त्यानंतर विरोधी पक्षाचे सदस्यही श्रद्धांजलीसाठी उभे राहीले. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतल्यानंतर सभागृहात गोंधळ झाल्यानं कामकाज १०मिनिटांसाठी तहकूब करावं लागलं होतं.

अंमली पदार्थांशी संबंधीत कोणत्याही प्रकरणात पोलीस अधिकारी अथवा कर्मचाऱ्‍यांचा थेट सहभाग आढळला तर त्यांना बडतर्फ केलं जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासात केली.