बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी धनंजय मुंडे यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) :  बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बातमीदारांना सांगितलं. बीडमधील हिंसाचाराची पाहणी केल्यानंतर मुंडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. बीडमध्ये ज्या पद्धतीनं दुर्दैवी घटना घडल्या, तशा कधीच घडल्या नव्हत्या. अर्थाचा अनर्थ काढून जिल्हा पेटवण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला. ज्या पद्धतीनं घटना घडल्यात त्यावरून हे मोठं षडयंत्र असल्याचं मुंडे यांनी सांगितलं. माजलगावात हिंसाचार रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांना लक्ष्य करण्यात आलं होतं. याप्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला शिक्षा व्हायलाच हवी, असं सांगत या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.