भारत- बांगलादेश भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी भारत सरकार समर्पित असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारत- बांगलादेश भागीदारी ही भारताच्या ‘शेजारी प्रथम’ या धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू असून, भारत सरकार ती आणखी मजबूत करण्यासाठी समर्पित असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. भारत-बांगलादेश संबंधांमध्ये उल्लेखनीय प्रगती झाली असून ते नवीन उंची गाठत आहेत, गेल्या नऊ वर्षांत जे काम एकत्रितपणे केले गेले ते काम या आधीच्या दशकातही झालं नसल्याचं मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना यांनी आज भारताच्या सहकार्यातून तयार झालेल्या तीन विकास प्रकल्पांचं संयुक्तपणे दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन केलं. त्यावेळी प्रधानमंत्री बोलत होते. सीमेवर शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांनी अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या जमीन सीमा करारावर स्वाक्षरी केली असून, भारत आणि बांगलादेशनं सागरी सीमा प्रश्नही सोडवला असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.