जपानमध्ये टोकियो इथं भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानमध्ये टोकियो इथं आज भारत आणि जपान दरम्यान पाचवा सायबर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोन्ही देशांनी द्विपक्षीय सायबर सहकार्यासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. तसंच 5G तंत्रज्ञानासह सायबर सुरक्षा आणि माहितीआणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातल्या प्रगतीचा आढावा घेतला. परराष्ट्र मंत्रालयातले सायबर मुत्सद्देगिरी विभागाचे संयुक्त सचिव मुआनपुई सैयावी यांनी भारतीय प्रतिनिधिमंडळाचं नेतृत्व केलं. 

दोन्ही बाजूंनी सायबर क्षेत्रातल्या  ताज्या घडामोडींवर आणि क्वाड चौकटी अंतर्गत संयुक्त राष्ट्र आणि इतर बहुपक्षीय आणि प्रादेशिक व्यासपीठांवरच्या परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली. सायबर सुरक्षेसाठी क्षमता विकास महत्वाचा असून याबाबत परस्पर सहकार्य करण्यावर  यावेळी दोन्ही बाजूंची सहमती झाली. पुढल्या वर्षी नवी दिल्ली इथं होणाऱ्या सहाव्या भारत-जपान संवादासाठी भारतानं जपानला आमंत्रित केलं.