विविध जातींमधल्या आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचं नाना पटोले यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : विविध जातींमधल्या आरक्षणाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीनं जातनिहाय जनगणना हाच उपाय असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेसाठी आले असता बातमीदारांशी बोलत होते. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण कमी होता कामा नये. त्यासाठी संसदेच्या विशेष अधिवेशनात, ५० टक्क्याच्या मर्यादेपलीकडे जाऊन मराठ्यांना आरक्षण देण्याविषयी केंद्र सरकारनं निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. तत्कालिन राज्य सरकारनं गायकवाड आयोग स्थापन केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने तो अमान्य करुन केंद्र सरकारकडे बोट दाखवलं. परंतु केंद्र सरकार मराठा आरक्षणाविषयी काहीही बोलायला तयार नाही, अशी टीका पटोले यांनी केली. इंडिया आणि भारत एकच आहे. मात्र, इंडियाला सत्ताधारी एवढे का घाबरतात, असा सवाल त्यांनी केला.