महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध उत्पादनाला आवश्यक बाजारपेठ मिळवून देण्यासोबतच महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी बचतगटाच्या योजनांसह विविध योजनांची प्रभावीपणे अंमबबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं काल मौलाना अबुल कलाम आझाद संशोधन केंद्रात महिला बचत गटांसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सर्वसामान्य, कष्टकरी तसंच गरजूंना उद्योगासाठी बँकेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा अधिकाधिक लाभ द्यावा, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यातल्या बचतगटाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचंही कराड यांनी योवळी सांगितलं. राष्ट्रीय सफाई कर्मचारी कामगार जनजागृती अभियानाला कराड यांनी मार्गदर्शन केलं. सफाई कामगारांना सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याचं, कराड यांनी नमूद केलं.