भारताच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी केलं कौतुक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जागतिक बँक समूहाच्या 95 देशांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या 11 कार्यकारी संचालकांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुंबई, अहमदाबाद आणि लखनौच्या दौऱ्यातील महत्वपूर्ण बाबींबाबत संक्षिप्त तपशील सांगितला. 2047पर्यंत विकसित देश बनण्याच्या भारताच्या महत्त्वाकांक्षेत परिवर्तनकारी सुधारणा आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागामुळं सक्षम झालेल्या देशाच्या सर्व क्षेत्रांतल्या वेगवान विकासाचं त्यांनी कौतुक केल्याचं अर्थ मंत्रालयानं ट्विटवरवरील संदेशात म्हटलं आहे.

पाणी, वीज, रस्ते आणि पायाभूत सुविधांसह सार्वजनिक सेवांच्या  वितरणावर लक्ष केंद्रित करून विशेषत: डिजिटल तंत्रज्ञान आणि स्टार्टअप्समध्ये भारतानं प्राप्त केलेल्या यशाचं जागतिक बँक समूहाच्या कार्यकारी संचालकांनी कौतुक केलं. विविध समुदायांना सक्षम करून गरिबांसाठी संधी निर्माण करण्यावर भारत भर देत असल्याचं अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी अधोरेखित केलं. 2014पासून देशात झालेल्या सुधारणांमुळं नियोजनाचं विकेंद्रीकरण शक्य झालं असून त्यामुळे राज्यांना महत्त्वाकांक्षी विकास उद्दिष्टे निश्चित करणं आणि त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करणं शक्य झालं आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या.