आगामी निवडणुकांसाठी सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून तयारीला लागण्याचा काँग्रेसचा निर्णय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) आगामी निवडणुकांच्या तयारीच्या उद्देशानं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची आज नवी दिल्ली इथं बैठक झाली. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी एकेका मतदारसंघाची जबाबदारी स्वीकारून निवडणुकांच्या तयारीला लागण्याचा निर्णय या बैठकीत झाला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी  बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात व्यापक स्तरावर पदयात्रा काढण्याचा, तसंच नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात पदयात्रा आणि बसयात्रा अशा संयुक्त यात्रा काढण्याचा निर्णय या बैठकीत झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येईल आणि महाराष्ट्रात कुणीही काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. राज्यात विविध शासकीय यंत्रणांची  भीती दाखवून फोडाफोडीचं राजकारण केलं जात आहे, मात्र महागाई, बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्यांचे प्रश्न घेऊन आम्ही जनतेसमोर जाणार आहोत, असं पटोले म्हणाले.