शिवसेना पक्षाचं नाव कुठेही जाऊ देणार नाही असा उद्धव ठाकरे यांचा निर्धार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे आपल्या पक्षाचं नाव असून आपण ते कुठेही जाऊ देणार नाही, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अमरावतीत पक्षकार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिली. उद्धव ठाकरे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या आज दुसरा दिवस आहे. लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याच्या हक्त मतदारांना मिळावा, या विषयावर चर्चा होण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. भाजपाने पक्षफोडीऐवजी पक्ष चोरीचं राजकारण केल्याचा आरोप, त्यांनी केला. याकरता भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला आहे, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. आपल्यावर घरी बसून राहल्याची टीका सगळेजण करतात, मात्र आपण घरी बसलो होतो, कोणाची घरं फोडली नाही, असं ठाकरे म्हणाले. शिवसेना हे पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं काही महिन्यांपूर्वी दिला. त्याला उद्धव ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं असून त्या याचिकेवर येत्या ३१ जुलैला सुनावणी होणार आहे.