मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मणिपूरमध्ये झालेल्या महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी संसद भवन संकुलात आयोजित वार्ताहर परिषदेत बोलत होते. ही घटना सुसंस्कृत समाजासाठी लज्जास्पद असल्याचं ते म्हणाले. महिलांवर होणारे हिंसाचार रोखण्यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी आपापल्या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करावी, असं आवाहन त्यांनी केलं. मणिपूरमध्ये पुरुषांच्या एका गटाकडून दोन महिलांना विवस्त्र करून त्यांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर आल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संसदेच्या अधिवेशनाबाबत ते म्हणाले, की लोकांच्या हितासाठी खासदार अधिवेशनाचा पुरेपूर वापर करतील. विधेयकांवर फलदायी चर्चा करण्याचं आवाहन त्यांनी खासदारांना केलं. या अधिवेशनात मांडली जाणारी विधेयकं थेट जनहिताशी निगडीत असल्यानं या अधिवेशनाला खूप महत्त्व आहे, असंही मोदी म्हणाले.