राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं बदल होणं आवश्यक असल्याची अजित पवार यांची स्पष्टोक्ती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसमधे, खऱ्या अर्थांनं फेरबदल होणं आवश्यक आहे, असं स्पष्ट प्रतिपादन विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. ते आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला २५ वर्ष झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पक्षात गेल्या २५ वर्षात जडणघडण होऊन सक्षम कार्यकर्ते आणि नेत्यांची नवी पिढी पुढं येत आहे, त्यामुळे भाकर फिरवायची असेल तर फिरवलीच पाहिजे, असं ते म्हणाले. पक्षात बरेचजण मंत्री झाले, पण दुसऱ्यांना निवडून आणू शकत नाहीत, मुंबईत पक्षाची ताकद कमी आहे, त्यामुळे थोडं मागं वळून आत्मचिंतन करणं गरजेचं आहे, आपण कमी का पडलो याचा विचार केला पाहिजे, असं ते म्हणाले. 

सध्या पंढरपूरची आषाढवारी सुरु आहे, पक्षाचे काही नेते नेहमी या वारीत सहभागी होत असतात. मात्र, आता इतरांनीही जमेल तसं वारीत सहभागी होऊन लोकांशी संवाद साधला पाहिजे. त्यातून सामाजिक सलोखा वाढण्यासाठी मदत होईल, असं अजित पवार म्हणाले. सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा, दंगली घडवण्याचा,  प्रयत्न केला जातोय. त्यामागचा सूत्रधार शोधून काढला पाहिजे. महिलांवर अत्याचार होताहेत ते थांबले पाहिजेत. यासाठी आपली पोलिस यंत्रणा चांगली आहे, मात्र राज्यसरकार कमी पडतय. अशा प्रकारांमुळे राज्याची प्रतिमा बिघडतेय असंही ते म्हणाले.