आरोग्यासंदर्भात मार्ग काढणारी वन हेल्थ यंत्रणा विकसित आणि दृढ करण्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं आवाहन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महामारीचा धोका अजूनही पूर्णपणे टळला असल्याचं खात्रीशीर म्हणता येणार नाही म्हणून आरोग्यासंदर्भात मार्ग काढणारी वन हेल्थ यंत्रणा विकसित आणि दृढ करण्याचे आवाहन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी आज तिसऱ्या G20 आरोग्यविषयक कार्यगटाच्या बैठकीत केलं. हैदराबाद इथं झालेल्या या बैठकीचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. कोविडसारख्या रोगाला आळा घालण्यासाठी तसंच जटील आरोग्य समस्यांवर कार्यक्षम वन हेल्थ ही संकल्पना उपयुक्त ठरेल असं त्या म्हणाल्या. G20 आरोग्य कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला आजपासून हैदराबाद इथं सुरुवात झाली. जागतिक समन्वय आणि सहभाग अधोरेखीत करत G20 या गटातील देशांशी भागीदारी ही महत्वाची असून त्यातून विश्वास तसंच ज्ञानाची देवाण घेवाण होईल असा विश्वास भारती पवार यांनी व्यक्त केला. सरकार २०३० पर्यंत सर्व आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी वचनबद्ध आहे असं केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांनी यावेळी सांगितलं.