मणिपूरमधील परिस्थितीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि ते राज्य आणि केंद्राच्या उच्च पदाधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत. शहा यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग, राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, केंद्रीय गृह सचिव आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसोबत दोन व्हिडिओ-कॉन्फरन्स बैठका घेतल्या. शहा यांनी शेजारील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा केली असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं. निवृत्त आयपीएस अधिकारी, माजी सीआरपीएफ प्रमुख, कुलदीप सिंग, यांची मणिपूर सरकारने सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. 

राज्यात निमलष्करी दल तैनात करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास आज आणखी तुकड्या पाठवण्यात येतील. दरम्यान, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी मणिपूरच्या जनतेला शांतता आणि सलोखा राखण्याचे आवाहन केलं आहे. उपमुख्यमंत्री वाय पॅटन यांनी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना दूरध्वनी करून नागालँडचे विद्यार्थी, कर्मचारी, रुग्ण आणि मणिपूरमध्ये राहणाऱ्या किंवा भेट देणाऱ्या व्यावसायिक व्यक्तींच्या सुरक्षेसाठी हस्तक्षेपाची विनंती केली.