राज्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : बुलढाणा जिल्ह्यात आज दुपारनंतर सर्वत्र वादळी वाऱ्यांसह गारपीट आणि मुसळधार पाऊस सुरु झाला आहे.  वादळी वाऱ्यांमुळं अनेक ठिकाणची झाडं  उन्मळून पडली असून अनेक घरांवरील छपरं उडाली आहेत.  या अवकाळी पावसामुळं खामगाव तालुक्यातल्या  दिवठाणा, रोहणा, काळेगाव परिसरातल्या शेतकऱ्यांच्या कांद्याच्या पिकाचं  मोठ्या प्रमाणात  नुकसान झालं  असून  त्यांच्या लिंबू आणि आंब्याच्या  पिकालाही  मोठी झळ पोहचली आहे. 

जालना जिल्ह्यातल्या  काही भागातही  आज दुपारी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. या तालुक्यातल्या माळशेंद्रा गावात झालेल्या जोरदार गारपीटीमुळं  कांदा बियाणे, उन्हाळी बाजरी आणि आंब्यांच्या फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.