रत्नागिरीत बारसू रिफायनरी विरोधात आंदोलनककर्त्यांची मुस्कटदाबी होत असल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा आक्षेप

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात बारसू इथं प्रस्तावित रिफायनरी बद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचं,उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. ही रिफायनरी व्हावी, असं पत्र माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला दिलं होतं, याकडे सामंत यांनी लक्ष वेधलं. आंदोलकांच्या मागण्या समजून घेण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं सामंत म्हणाले. माध्यमांनी फक्त विरोधाच्या बातम्या न दाखवता, रिफायनरीला समर्थन देणाऱ्या बातम्याही दाखवाव्यात,असं आवाहन सामंत यांनी केलं. 

दरम्यान, रिफायनरी बाबतीत स्थानिक भूमीपुत्रांच्या मनातल्या शंका-कुशंका दूर करुन त्यांना विश्वासात घ्यावं असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक आंदोलकांना अटक करण्यात येत आहे, पत्रकारांना धमकावण्यात येत आहे याचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. विकास सर्वांना विश्वासात घेऊन केला पाहिजे. स्थानिक भूमीपूत्रांच्या हितांचं, हक्कांचं रक्षण झालं पाहिजे असं सांगत संवादातून मार्ग निघेपर्यंत सर्वेक्षण थांबवावं,असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

बारसू परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आंदोलन करत असताना त्यांच्यावर दडपशाही करून सरकारला शेतक-यांचे बळी घ्यायचे आहेत का? असा सवाल करणारं ट्विट विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनीही केलं आहे.