विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं - डॉ. सुभाष सरकार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष सरकार यांनी काल पुण्यात केलं. पुणे व्यवस्थापन संस्थेचा पदवी प्रदान समारंभ डॉक्टर सरकार यांच्या उपस्थितीत पार पडला; त्यावेळी ते बोलत होते. भारताला प्राचीन काळापासून शिक्षणाची परंपरा असल्याचं त्यांनी नमूद केलं. आयुष्यात समस्या आल्या तर त्याला खंबीरपणे सामोरे जा. सुरक्षित कोषातून बाहेर पडल्यावरच मोठं यश मिळतं असं ते म्हणाले. भारत पुढील काळात जगातील सर्वात मोठं स्टार्ट अपचं केंद्र असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष रमण प्रीत, संचालक डॉक्टर भारत भूषण सिंह यावेळी उपस्थित होते.