स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टँड अप इंडिया योजनेचा सहावा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. याअंतर्गत आतापर्यंत देशभरातल्या १ लाख ८० हजार ६३६ खात्यांना ४० हजार ७१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महिला, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती श्रेणींमध्ये उद्योजकतेला चालना देणं, हा या योजनेचा उद्देश आहे.

देशातल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसंच महिलावर्ग यांच्यातल्या उद्योजकतेला चालना देण्यासाठी स्टँड- अप इंडिया योजना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. देशातले उद्योजक, त्यांचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांचं जीवनमान सुधारण्यासाठी स्टँड - अप इंडिया योजना महत्वपूर्ण भुमिका बजावत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे.