स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात महत्वाची भूमिका बजावणार - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) स्वातंत्र्याच्या अमृत काळात नव्या भारताच्या विकासामध्ये युवा नागरी सेवक सर्वात  महत्वाची भूमिका बजावणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं नागरी सेवा दिना निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित करताना बोलत होते. कोविड-१९ महामारीचं आव्हान असूनही, भारत ही जगातली पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, आणि तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था असल्याचं ते यावेळी म्हणाले. अमृत काळात, आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न पूर्ण करणं, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सार्वजनिक प्रशासनामधल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री पुरस्कार प्रदान केले.